जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील उच्चस्तरीय अधिकारी ते शाळकरी विद्यार्थी तसंच ग्रामस्थ, महिला हातात झाडू घेऊन प्रत्येक गाव स्वच्छ करताना दिसत होते. शाळकरी मुलं स्वच्छतेचा फलक हाती घेत प्लास्टीक बंदीचा संदेश देत गावातून प्रभात फेरी काढत होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असं भारावलेलं वातावरण महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पहायला मिळालं. लोनाड ग्रामपंचायतीमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांच्या हस्ते झाला. गावक-यांनी प्लास्टीकचा वापर न करता कापडी पिशव्यांचाच वापर करावा, प्लास्टीकचा वाढता भस्मासूर रोखण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यायला हवा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यानिमित्तानं गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये बसवण्यात आलेल्या सॅनिटरी डिस्पोझल मशिनचं उद्घाटनही सोनावणे यांच्या हस्ते झालं. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अधिका-यांनीही श्रमदान केलं.