कल्याण रेल्वे पोलीसांनी जवळपास ३६ लाखांचे नोकीया कंपनीचे १९४ मोबाईल फोन्स हस्तगत केले आहेत. मोबाईलच्या वाढत्या चोरीमुळे कल्याण रेल्वे पोलीस आयुक्तांनी प्रत्येक फटका पॉईंटवर पोलीस कर्मचारी नेमण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान वालधुनी फटका पॉईंटवर ४ अनोळखी व्यक्ती रेल्वे मार्गातून २ सॅक आणि १ बॅग पायी घेऊन जाताना दिसले. या चौघांना हटकले असता ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या दिशेने रेल्वे मार्गातून पळू लागले. पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला. हे पाहून या चौघांनी त्यांच्या हातातील २ सॅक आणि १ बॅग रेल्वे मार्गाच्या बाजूला असलेल्या गवतात आणि गटारात टाकून ते कोळसेवाडी दिशेने पळून गेले. फेकून दिलेल्या या बॅग पोलीस ठाण्यात आणून तपासल्या असता त्यामध्ये नोकीया कंपनीचे ७.२ या मॉडेलचे प्रत्येकी १८ हजार ५९९ किंमत असलेले १८३ मोबाईल्स तर नोकीया कंपनीचे ८.१ या मॉडेलचे प्रत्येकी १६ हजार ४९९ रूपये किंमतीचे ११ असे एकूण १९४ मोबाईल सापडले. कल्याण रेल्वे पोलीसांनी हे १९४ मोबाईल जप्त केले आहेत. हे मोबाईल कुठून आणले याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.