जिल्ह्यामध्ये सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला असून खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड झाली आहे. जिल्ह्यात या हंगामासाठी सुमारे १३३ टक्के रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला असून खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. विविध योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यात १७७ शेतीशाळा सुरु असून ५ हजार ३१० शेतकरी बांधवाना प्रशिक्षण दिले जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी सांगितले. जिल्ह्यात सुमारे १६५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दमदार पाऊस झाल्यानं खरीपाची लागवड जवळपास पूर्ण होत आली असून आतापर्यंत ८७ टक्के लागवड झाल्याचे वाघ यांनी सांगितले. त्यामध्ये भातशेतीची ४७ हजार १६९ हेक्टरवर लागवड झाली असून नागली १८२५ हेक्टर, वरी ९९२ हेक्टर तर तूर ४ हजार ३२७ हेक्टर लागवड झाली आहे. खरीप हंगामासाठी १३३ टक्के रासायनिक खतांचा पुरवठा झाला असून खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ११२ कृषी सेवा केंद्रांतुन खतांची आणि १२० कृषी सेवा केंद्रांतुन बियाणे विक्री केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सेस फंडातून ८०० क्विंटल भात बियाणे शेतकरी बांधवांना ५० टक्के अनुदानावर देण्यात आले आहे. विविध योजनेंतर्गत जिल्ह्यात १७७ शेतीशाळा सुरु असून ५३१० शेतकरी बांधवाना प्रशिक्षण दिले जात आहे. क्रॉपसप योजनेच्या माध्यमातून भात आणि नागली पिकावरील कीड, रोग इत्यादी सर्वेक्षण सुरु असून शेतकरी बांधवाना किड/रोग नियंत्रणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले जात असल्याचे वाघ यांनी सांगितले.
जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी बांधवांचा पिक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आता पर्यंत एकूण ३१ हजार ४४ शेतकऱ्यांनी भात पिकाचा विमा उतरविला आहे. त्या माध्यमातून १२ हजार ५४३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी भात पिकाचा विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.