आदिवासी बांधवांच्या रोजगारासाठी जिल्हा परिषदेनं प्रयत्न चालवले असून त्यामुळे जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे. शहापूर तालुक्यातील अघई, कळमगाव, गोठेघर, खातिवली, मुरबाड तालुक्यातील खेडले, कोळोशी, मिल्हे, खोपोवली, खुटारवाडी, धसई, वैशाखरे, न्याहाडी, भोरंडे, फांगणे तर भिवंडी तालुक्यातील ओवळी, नांदिठणे, पिळंजे बुद्रुक, पिळंजे खुर्द, देपोली, चावे आणि तलेवाडी गावातील तलावात मत्स्य बीजं सोडण्यात आली आहेत. ही सगळी गावं पेसा क्षेत्रातील आहेत. पेसा कायद्यानुसार या तलावांची मालकी, देखरेख, व्यवस्थापनाची जबाबदारी स्थानिकांकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. यामुळं स्थानिक जनतेला उपजिविकेचं साधन म्हणून रोजगार उपलब्ध होणार आहे.