भारतीय जनता पक्षाचं विखारी राजकारण जनहित विरोधी राजकारण आणि जनतेचं दिशाभूल करणारं राजकारण असल्यामुळेच भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी त्रास सहन करावा लागत आहे असे उद्गार काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढले. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देश पातळीवर काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जाणार असून या आंदोलनाची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत सावंत यांनी हे उद्गार काढले. केंद्र सरकारच्या धोरणामुळे आर्थिक पातळीवर घसरण सुरू आहे. ग्राहकाची खरेदी क्षमता घटली आहे. खाजगी गुंतवणूकदार गुंतवणूक करत नाहीयेत. आयात-निर्यातीमधील दरी वाढली आहे. तर सरकारी गुंतवणूक होत नसल्याचं सावंत यांनी सांगितलं. ठाण्यातील वागळे इस्टेटचं उदाहरण पाहता यावर्षी वागळे इस्टेटमध्ये अवघी १.१ टक्के उद्योगांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या ७ वर्षातील ही सर्वात कमी वाढ आहे. केंद्र शासनाला रिझर्व्ह बँकेकडून साडेतीन लाख कोटी घ्यावे लागले. आता रिझर्व्ह बँक सोने विकत आहे म्हणजे देशाची आर्थिक परिस्थिती किती खराब आहे हे यातून दिसून येत. ३७० कलम आणि काश्मीर विषयी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अंगाशी आल्याचा आरोपही सावंत यांनी यावेळी केला. राष्ट्रवादाच्या गप्पा मारून या परिस्थितीवरून लक्ष वळवण्याचाच सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. या सर्वांविरोधात काँग्रेसतर्फे देश पातळीवर आंदोलन केलं जाणार आहे. ठाण्यामध्ये हे आंदोलन ठाणे रेल्वे स्थानकात उद्या केलं जाणार आहे. केंद्राचं धोरण, शेतक-यांवर होणारा अन्याय आणि वाढती बेरोजगारी या विरोधात हे आंदोलन असल्याचं काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी सांगितलं.