जिल्ह्यात नव मतदारांची संख्या १ लाख ७० हजार ६९९

छायाचित्रांसह मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ५ जानेवारी रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या १ लाख ७० हजार ६९९ एवढी असून जिल्ह्यात आता एकूण मतदारांची संख्या ६४ लाख ६६ हजार ७९८ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. जिल्हयामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १ जानेवारी पूर्वी आणि विशेष संक्षिप्त कार्यक्रमानंतर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण ८४१ वरून ८४३ झाले आहे. ५ जानेवारी रोजी जिल्ह्यात एकूण मतदार ६४ लाख ६६ हजार ७९८ असून त्यात महिला मतदारांची संख्या २९ लाख ५७ हजार १४ तर पुरूष मतदारांची संख्या ३५ लाख ९ हजार ४२ आहे. इतर मतदारांची संख्या ७४२ आहे असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
मतदार नोंदणी कार्यक्रमात १ लाख ७० हजार ६९९ एवढ्या मतदारांची वाढ झाली असून त्यामध्ये महिला ८१ हजार ६७६ तर पुरूष ८८ हजार ७८४ आहेत आणि इतर मतदारांची संख्या २३९ आहे. १ जानेवारीला जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले ८ लाख ३५ हजार ५०८ इतके मतदार होते. मागील एक वर्षामध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती असताना देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी कार्यालयमधील अधिकारी, कर्मचारी तसेच बीएलओ यांच्या प्रयत्नाने स्थलांतरित झालेल्या व छायाचित्र नसलेल्या ५ लाख १० हजार ३०१ इतक्या मतदारांची वगळणी करण्यात आली आहे.
महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत यांच्या निवडणूकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी SVEEP कार्यक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हयातील नवी मुंबई, कल्याण डोंबिवली येथील राजकीय पक्षांची बैठक घेवून त्यांना जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी सहकार्य करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. मतदार नोंदणी जनजागृतीसाठी शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, घंटा गाडी, तीन चाकी गाडी यांचे द्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती. तसेच स्वीप कार्यक्रमांची विविध माध्यमांद्वारे संदेश, मालमत्ता कर पाणीपट्टी देयकावर संदेश छापून जनजागृती करण्यात आली. स्थानिक संस्थांच्या कार्यलयात कम्युनिटी फॅसिलीटी सेंटर सुरू करून तेथे भेट येणाऱ्या अभ्यागतांना वोटर हेलपलाईन ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याच्या सुविधांबाबतची माहिती देण्यात आली, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितले. जिल्हा एडस् प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे यांच्याशी सलग्न असलेल्या तृतीय पंथी व वंचित घटकातील महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांची बैठक घेण्यात आली. त्याद्वारे वंचित घटकांतील मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण येथे शिबिरे आयोजित करण्यात आली. जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत ७४२ तृतीय पंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अन्य जिल्हयांच्या तुलनेत ठाणे जिल्हयामध्ये सर्वात जास्त तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी झाली आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम, नवीन गृहनिर्माण सोसायटी, वंचित महिला, तृतीयपंथी, आदीवासी पाडे, मोठमोठ्या औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठका जिल्हास्तरावर घेण्यात आल्या. मतदार नोंदणी करण्यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय विशेष शिबिरांचे नियोजन करून कार्यक्रमांची आखणी करुन देण्यात आली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading