जिल्ह्यात तयार होणार 500 आपदा मित्र

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत ठाणे जिल्ह्यातून 500 आपदा मित्र तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या तुकडीच्या 12 दिवसांच्या प्रशिक्षण वर्गास ठाण्यातील व्ही.पीएम.केजी. जोशी कला महाविद्यालय आणि एन.जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालयात सुरु झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आपत्ती व्यवस्थापन आणि नियंत्रण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध क्षेत्रातील संबधितांना प्रशिक्षित मनुष्यबळाचे नजीकच्या काळात मोठी गरज भासणार असून त्यासाठी सरकारतर्फे आपत्ती व्यवस्थापन विषयक विविध प्रशिक्षण शिबिरांद्वारे अधिक जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने संपूर्ण देशात आपदा मित्र हा महत्वाचा उपक्रम सुरु केला असून या उपक्रमाचा समाजाला उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.
दिल्लीतील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये आपदा मित्रांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या पुढाकाराने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत ठाणे जिल्ह्यातून 500 आपदा मित्र तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयातील राष्ट्रीय कॅडेट कोअर (एन.सी.सी) आर्मी गर्ल्स, एन.सी.सी नेव्हल युनिट, राष्ट्रीय सेवा योजना व आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यपन करणारे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. हे प्रशिक्षण एकूण 12 दिवस चालणार असून एनडीआरएफ प्रशिक्षित झालेले मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण देणार आहेत.
यावेळी आपदा मित्र प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना शिनगारे म्हणाले की, नैसर्गिक, मानवनिर्मित्त आणि हवामान बदलामुळे येणाऱ्या आपत्तीला नियमितपणे सामना करावा लागतो. यामध्ये भूकंप,पूर,चक्रीवादळ, दुष्काळ, भूस्खलन, आग, औद्योगिक आणि रासायनिक धोके यांचा समावेश आहे. होणार आहे. आपत्ती ही सांगून येत नाही. आपत्तीच्या काळात मानवी आणि वित्तहानी होऊ नये, आपत्तीनंतर लवकरात लवकर स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी आपदा मित्र उपयुक्त ठरणार आहेत. आपत्ती प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पाच लाखाचा विमा सुरक्षा देण्यात येणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे, आपत्तीकाळात आणि आपत्तीनंतरच्या काळात करावयाच्या उपाययोजना आणि मदतकार्याविषयीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 18 ते 40 वर्ष वयोगटातील शिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यासाठी हे 12 दिवसांचे निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणार्थींना लाईफ जॅकेट, बॅटरी, दोरखंड तसेच आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मदतकार्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading