जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी आणि नागरिकांना योग्य पद्धतीने उपचार मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचा आढावा घेण्यात यावा. तसेच प्रत्येक शहरातील लोकसंख्येनुसार आरोग्य व्यवस्था कशी असावी, शासकीय अथवा पालिका संचलित रुग्णालयामध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यास त्या जागी मनुष्यबळ वाढविणे याबाबत कार्यवाही करण्यात यावी. तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या देखरेखीखाली समिती नेमण्यात यावी. अशी मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी या महत्वाच्या विषयाची मागणी केली. यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरच समिती नेमण्यात येणार असून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. या बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी जिल्ह्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदार संघासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी स्थानिक शासकीय अथवा पालिका संचलित रुग्णालयामध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यास त्या जागी मनुष्यबळ वाढविणे याबाबत कार्यवाही करण्यात यावी. तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या देखरेखीखाली समिती नेमण्यात यावी. या समितीच्या माध्यमातून येणाऱ्या अहवालातून जिल्ह्यातील रुग्णालय अधिक सक्षम बनविण्यात यावे. असे महत्वाचा विषय यावेळी बैठकीत उपस्थित केला. यावर पालकमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. टीडीआरएफ ( ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल) या धर्तीवर जिल्ह्यातील प्रत्येक महापालिकेची स्वतंत्र अशी टीम तयार करावी. यामुळे रोजगार उपलब्ध सह आपत्कालीन स्थितीत मोठी मदत नागरिकांना होईल. आपत्ती व्यवस्थापना मध्ये या टीमची मोठी मदत होईल. इर्शाळवाडीसारख्या दुर्घटनेवेळी या दलांचा मोठा फायदा होतो. यामुळे या दलांच्या निर्मितीसाठी कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी यावेळी खासदार शिंदे यांनी केली. जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रस्तावित असलेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुशीवली धरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा. यासाठी जिल्हा प्रशासन पाट बंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करावी अशीही मागणी यावेळी खासदार शिंदे यांनी केली.