जिल्ह्यातील ग्रामीण भागात 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार असून यावेळी कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात तसेच बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील सुमारे 1652 शाळांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी दिली. या मोहिम कालावधित उर्वरित सर्व शाळाबाहय मुला-मुलींना आशा आणि अंगणवाडी कार्यकर्ती मार्फत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. 1 ते 19 वर्ष वयोगटातील शालेय आणि शालाबाह्य अशा साधारण 4 लाख 88 हजार 903 मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येणार आहे. 1 ते 2 वयोगटातील बालकांना अर्धी गोळी तर 2 वर्षावरील मुलांना एक गोळी चावुन पावडर पाण्यात विरघळवून खायची आहे. या मोहिमेचा उद्देश मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावणे असल्याचे परगे यांनी सागितले. या वर्षी शासकीय आणि खाजगी अशा 1652 शाळांमधे 10 ऑक्टोबरला तर त्या दिवशी काही कारणामुळे गोळी घेऊ न-शकलेल्या मुला-मुलींना 17 ऑक्टोबर म्हणजे मॉप-अप दिनी गोळ्या देण्यात येणार आहेत, असे ही परगे यांनी कळविले आहे.