कोरोनानंतर सुरक्षित आणि निर्भय वातावरणात जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. स्वच्छतेसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, शिक्षकांनी ह्या प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी केली होती. जिल्हा परिषदेच्या मुरबाड, अंबरनाथ, कल्याण,भिवंडी, शहापूर आदी पाच तालुक्यात १३२८ शाळा आहेत. या प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं आगळंवगेळं स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली तर काही ठिकाणी बैलगाडी किंवा स्थानिक वाहनातून विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर काही शाळांमध्ये नाविन्यपूर्ण खेळ, उपक्रमानीही शाळेचा पहिला दिवस साजरा झाला. कोरोना महामारीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ऑनलाइन पद्धतीने गेल्या अडीच वर्षांपासून सुरू होत्या. मधल्या काळात करोना नियंत्रण नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू झाल्या. त्यानंतर शाळांना उन्हाळी सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून विद्यार्थीही शाळेत यायला मिळत असल्यामुळं आनंदात दिसत होते. महापालिका हद्दीजवळ असणा-या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी तरी महापालिकेनं बसेस सोडाव्यात अशी मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.