जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रत्येक विद्यार्थी एक नवा अनुभव घेऊनच पुढे जाणार आहे तर उद्याचा वैज्ञानिक संशोधक असेल. या प्रदर्शनातील त्याचा अनुभव त्याला निश्चितच समृध्द करेल असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित ४५व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यंदा शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची आवश्यकता असा विषय देण्यात आला होता. या प्रदर्शनात सर्व व्यवस्थापनाच्या शाळा तसंच महापालिका क्षेत्रातील ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी ६० प्रकल्प यावेळी सादर केले होते. त्याचबरोबर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षक तसंच शाळा सहाय्यकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत ३० प्रकल्प सहभागी झाले होते. प्राथमिक स्तरावर चंद्रकांत पाटकर विद्यालयाला प्रथम, आदर्श विद्या मंदिरला द्वितीय, संत तुकाराम हिंदी विद्यालयाला तृतीय तर शहापूरमधील प्रगती विद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. माध्यमिक गटात हलारी विसा ओसवाल विद्यालयाला प्रथम, डॉ. बेडेकर विद्यामंदिर द्वितीय, डॉ. सामंत विद्यालय तृतीय तर आसनगावच्या आदिवासी विभागातील महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. प्राथमिक गटातून जिल्हा परिषद शाळा कळमपाडा, माध्यमिक गटातून शुक्ला एज्युकेशन सोसायटी तर प्रयोगशाळा सहाय्यक गटातून सावित्रीदेवी थिराणी विद्यालयाला प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. हे सर्व प्रकल्प राज्यस्तरावर आता जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करणार आहेत.