जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन

अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत १५ जुलै ते ३० जुलै पर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या घरात लहान बालक आहेत अशा कुटुंबाना आरोग्य पथक भेट देऊन मुलांना अतिसार होऊ नये यासाठी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने पाच तालुक्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाच्या ग्रामीण भागात हा पंधरवडा कार्यक्रम करताना पालक आणि काळजी वाहकामध्ये अतिसार तसेच कोविड १९ आजाराच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापन विषयक योग्य वर्तवणूक बिंबवणे, अतिसार असलेल्या बालकांमध्ये ओआरएस आणि झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण जास्तीत जास्त होईल याची सुनिश्चिती करणे, त्याचबरोबर सामाजिक आणि आरोग्य संस्था स्तरावर बालकांमधील अतिसाराच्या रुग्णाचे व्यवस्थापन हे स्टॅडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल नुसार होत असल्याबाबतची खात्री करणे ही तीन उद्दिष्ट्ये साध्य करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ओआरएस कॉर्नर तयार करून ओआरएस तयार करण्याचे प्रात्येक्षिक दिले जाणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्भक मृत्यूदर आणि बालमृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मिलिनियम डेव्हलपमेंट गोल्स यांचे उद्दिष्ट आहे. देशात ५ वर्षांपर्यतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून ११ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. आणि ह्या बालक मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त असते. त्यामुळे अतिसारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण शून्य करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading