लॉकडाऊनमध्ये शिथीलता न आणल्यास कायद्याचं उल्लंघन करण्याशिवाय अन्य पर्याय राहणार नसल्याचा नौपाडा व्यापारी मंडळाचा जिल्हाधिका-यांना इशारा

लॉकडाऊनमुळे आर्थिक भार आला असून हा आर्थिक भार पेलण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथीलता न आणल्यास कायद्याचं उल्लंघन करण्याशिवाय अन्य पर्याय राहणार नाही असा इशारा नौपाडा व्यापारी मंडळानं जिल्हाधिका-यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. ठाणे शहर हे दुस-या स्तरात असताना डेल्टा प्रकारामुळे शासनानं सर्व राज्याचाच तिस-या स्तरात समावेश केला. यामुळं व्यवसाय ४ वाजता बंद करण्याबरोबरच शनिवार-रविवारी बंद ठेवावे लागत आहेत. मात्र बस, खाजगी वाहतूक, रिक्षा, छोटीमोठी किरकोळ विक्रीची दुकानं रात्रीपर्यंत सुरू असतात. व्यापारी वर्गानं आत्तापर्यंत लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केलं आहे. मात्र शासनानं नव्या आदेशामुळं उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढत राहिल्यास आमची आस्थापनं बंद करण्याशिवाय आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. आस्थापनांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग, त्यांचे पगार, दुकानाचे भाडे, लाईट बील, घरांचे हफ्ते, मुलांच्या शाळांचे शुल्क, सरकारचे कर अशा अनेक गोष्टी टाळता येऊ शकत नाहीत. यामुळं प्रचंड भार व्यापारी वर्गावर आला आहे. ठाण्यामध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळं व्यापारी वर्गावरील बंधनं शिथील करावीत, शासनाच्या सर्व नियमांचं पालन केलं जाईल. व्यापारी आस्थापनांच्या वेळेत किमान ८ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी तसंच शनिवार-रविवारही व्यवसाय सुरू ठेवण्यास सूट असावी अशी विनंती नौपाडा व्यापारी संघातर्फे जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading