जिल्हा नियोजनाचा निधी समर्पित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना पालक मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ खर्चाचा आढावा त्यांनी घेतला त्यावेळी जिल्हा वार्षिक योजनांचा निधी १०० टक्के खर्च करावा असे पालकमंत्र्यांनी सांगीतले.
जिल्ह्यासाठी आतापर्यंत झालेल्या खर्चाच्या टक्केवारीवर समाधान व्यक्त करुन आलेल्या निधीचा योग्य नियोजन करून कोणताही निधी अखर्चिक राहणार नाही, याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी. ज्या योजनेत खर्च होत नसेल त्या योजनेचा निधी पुनर्विनियोजनाव्दारे इतर योजनेला देण्यात यावा, असे निर्देशही यावेळी दिले. साकव योजनेचा खर्च न होणारा निधी जिल्हा परिषद रस्त्यासाठी पुनर्विनियोजन करण्यात यावा. जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) ७८ टक्के, अदिवासी उपयोजना ८० टक्के आणि विशेष घटक योजना ९७ टक्के खर्च झाला असल्याने उर्वरित निधी खर्च करण्याबाबत संबंधितानी कार्यवाही करण्याची सूचना यावेळी केली. तसेच जे विभाग निधी खर्च करणार नाहीत त्यांच्यावर कार्यवाही करावी, असा आदेश पालकमंत्री देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.