जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ माॅर्फ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

ठाण्यातील सिंधी बांधवांमध्ये मॉर्फ केलेला व्हिडिओ प्रसारीत करून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात चिथावणी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात कोपरी पोलीस ठाण्यात जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या सहीचे निवेदन दिले. जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाला मॉर्फ करून चिथावणी दिली जात आहे हे असह्य आहे. म्हणून आता आम्ही न्याय मागण्यासाठी येथे आलो आहोत असं प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांनी सांगितलं आणि असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाचा व्हिडीओ मॉर्फ करुन तो सोशल मिडीयावर पसरवून त्यांची नाहक बदनामी करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश कोटवानी, भाजपा युवा मोर्चाचे ओमकार चव्हाण यांनी बैठक घेतली. या बैठकीत आव्हाड यांचा व्हिडिओ मॉर्फ करून सिंधी समाजाला दाखवून चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. तसेच आव्हाड यांच्या घरावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा कट रचून आव्हाड यांना जीवे ठार मारण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे सिंधी समाजाची दिशाभूल करुन त्यांची बदनामी करण्या-यांविरोधात तसेच कोपरी येथील बैठकीमध्ये चिथावणीखोर भाषण करणा-यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. पण सत्तेचा वापर करून आव्हाड यांना बदनाम करण्याचा आणि त्यांच्या घरावर हल्लाबोल मोर्चा नेण्यासाठी चिथावणी दिली जात आहे. म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी येथे आलो आहोत. ज्यांनी व्हिडिओ मॉर्फ केला आहे त्यांना समाजकंटक असेच म्हणावे लागेल. आता पोलिसांनी सत्याची कास धरून ज्या शिंदेगटाच्या लोकांनी शंकर मंदिरात बैठक घेतली त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading