ठाण्यातील जांभळीनाका चौकातील गेल्या ६ महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेला रस्ता सुरू करावा अशी येथील व्यापा-यांची मागणी आहे. कोरोनाचं लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजे गेल्या मार्चपासून जांभळीनाका चौकातील कोर्टनाका ते जांभळीनाका हा रस्ता बंद आहे. यामुळं व्यापा-यांबरोबर ठाणेकरांचीही गैरसोय होत आहे. गेल्या काही महिन्यात चित्रपटगृह सोडल्यास सर्व व्यवहार, सर्व रस्ते पूर्ववत करण्यात आले आहेत. मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दुचाक्या लावून ठेवलेल्या असतात. त्यामुळं मोठी गैरसोय होत आहे. येथील व्यापा-यांना हा रस्ता बंद असल्याचा मोठा त्रास होत असून या परिसरातील व्यापा-यांकडे सर्वसामान्य ठाणेकरांना जाणंही काहीसं त्रासदायक ठरत आहे. त्यामुळं हा रस्ता पुन्हा सुरू करावा अशी मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.