जाचक अटींमुळे हॉटेल आणि बार सुरू करण्यास हॉटेल व्यावसायिकांचा प्रतिसाद नाही

ठाणे महापालिकेनं हॉटेल आणि बार उघडण्यास परवानगी दिली असली तरी हॉटेल व्यावसायिकांकडून मात्र यासाठी हवा तसा प्रतिसाद मिळाल्याचं दिसत नाही. गेल्या सहा महिन्यापासून उपहारगृहं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळं उपहारगृहातील कर्मचारी वर्ग हा गावाला गेला आहे. हा कर्मचारी वर्ग उपलब्ध झाला नसल्यामुळं अनेक उपहारगृहं अद्यापही सुरू झालेली नाहीत. ठाणे महापालिकेनं कालपासून बार आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी दिली होती. पण पालिकेच्या या परवानगीला मात्र हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी घातलेल्या अटी या व्यावसायिकांना अडचणीच्या ठरणार आहेत. बार, रेस्टॉरंट जर संध्याकाळी ७ ला बंद करायच्या असतील तर ती सुरू करण्यात अर्थ काय असा हॉटेल व्यावसायिकांचा प्रश्न आहे. कारण साधारणत: हॉटेलचे ग्राहक हे रात्री ८-९ नंतर हॉटेलमध्ये येत असतात. त्यातच एकूण क्षमतेच्या ५० टक्केच क्षमता वापरायची आहे. त्यामुळं हॉटेल व्यावसायिकांचं दोन्ही बाजूंनी नुकसान आहे. हॉटेलमध्ये प्रवेश देताना त्यांची तपासणी करावी लागणार आहे आणि ताप नसणा-या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा लागणार आहे. तसंच हॉटेलमधील स्वयंपाकघरातील कर्मचा-यांचीही नियमित तपासणी करावी लागणार आहे. याप्रकारच्या अनेक जाचक अटींमुळे हॉटेल व्यावसायिक हॉटेल सुरू करण्याच्या फारशा मनस्थितीत नाहीत. त्यामुळेच ठाण्यातील अनेक हॉटेल्स अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading