गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळ राबोडी भागातील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येचा प्रमुख सूत्रधार पकडण्यात ठाणे पोलिसांना यश आलेले नाही. याचा तपास अन्य यंत्रणांना देण्यात येऊन ‘हमें इंसाफ चाहीये’, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. जमील शेख हे सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते होते. बेकायदा बांधकामे, भ्रष्टाचार या विरोधात वाचा फोडून गोर-गरीबांना न्याय देण्याचा प्रयत्न करत होते. सव्वा वर्षापूर्वी त्यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून आजतागायत गुन्हेगारांचा आणि मुख्य सुत्रधाराचा शोध लावून त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा करणारे आमदार संजय केळकर यांनी जमील शेख यांच्या कुटुंबियांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या प्रकरणाचा पूर्ण तपास करण्यात ठाणे पोलिसांना अपयश आले आहे. मी आणि शेख कुटुंबीयांसह नागरिकांनी आंदोलने, निवेदने, जनजागृती, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी अशा विविध माध्यमांतून आजतागायत पाठपुरावा सुरू ठेवला. अधिवेशनातही याबाबत वाचा फोडली, मात्र अद्याप दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येतील मुख्य सूत्रधार ठाणे पोलीस पकडू शकलेले नाहीत, ही दुर्दैवी बाब असल्याचे केळकर म्हणाले. दोन दिवसांपूर्वी जमील शेख यांच्या कुटुंबियांसह आपण गृहमंत्र्यांची भेट घेतली. जर ठाणे पोलीस मुख्य सुत्रधारास पकडू शकत नाहीत नसतील तर अन्य यंत्रणांकडे हा तपास द्यावा अशी मागणी त्यांच्याकडे केली असल्याची माहिती केळकर यांनी दिली. गृहमंत्र्यांनी गृह सचिवांना दिलेल्या निर्देशानंतरही ठाण्यात हुक्का पार्लर, लेडीज बार हे अवैध धंदे अद्याप सुरू आहेत. ठाणे हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असून हे धंदे शहराची प्रतिमा डागाळत आहे. याबाबत ठाणे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे संजय केळकर यांनी गृहमंत्र्यांच्या भेटीत स्पष्ट केले.