जमिनीच्या वादात एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंब्र्याजवळील वाकळण गावात शिवराम पाटील, पत्नी दीपाली आणि सहा वर्षाची मुलगी अनुष्कासह राहत होते. शिवराम पाटील यांचा त्यांच्या भावाशी आणि त्यांच्या पत्नीशी मालमत्तेवरून वाद होता. कुटुंबातील लोकांच्या होणा-या त्रासाला कंटाळून शिवराम पाटील यांनी आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी लिहून ज्यांच्यामुळे त्रास झाला आणि नैराश्य आले त्यांचा उल्लेख करत तिघांनी जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी शिवराम पाटील यांनी ही चिठ्ठी नातेवाईकांच्या व्हॉटस् ॲपवर व्हायरल केली. हे पाहून शिवरामच्या पत्नीचा भाऊ श्रीनाथ किणे याने असा मेसेज का टाकला याची चौकशी करण्यासाठी मध्यरात्रीनंतर त्याचा मित्र किसन याला शिवरामच्या घरी पाठवले. मात्र दरवाजा वाजवूनही प्रतिसाद मिळाला नसल्यानं त्यानं धडक मारून दरवाजा उघडला तेव्हा शिवराम, दीपाली चिमुरड्या अनुष्कासह गळफास घेतलेले आढळून आले.