भारतीय जनता पक्षाच्या जनआशीर्वाद यात्रेत अनेकांना हिसका दाखवणा-या खिसेकापूंना पोलीसांनी आपला हिसका दाखवला आहे. वागळे गुन्हे शाखेनं याप्रकरणी ४ जणांची टोळी जेरबंद केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात अनेकांचे खिसे कापले गेले होते तर काहींचे मोबाईलही गायब झाले होते. पोलीसांनी याप्रकरणी अबुबकर अन्सारी, नदीम अन्सारी, अतिक अन्सारी, अश्पाक अन्सारी अशा मालेगाव येथील चौकडीला जेरबंद केलं आहे. ही चौकडी पनवेल येथील कल्पवृक्ष हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी या चौघांना पकडून त्यांची चौकशी केली असता त्यांनी जनआशीर्वाद यात्रेत अनेकांचे खिसे कापण्याबरोबर मोबाईल लंपास केल्याची कबुली दिली. पोलीसांनी १ लाख १९ हजारांची रोकड आणि १० मोबाईल या चौकडीकडून हस्तगत केले आहेत. ही चौकडी सराईत खिसेकापू असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हे दाखल आहेत.