छगन भुजबळ यांचा पुतळा जाळणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून जशास तसे उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळ यांच्या कथीत उद्गाराचा आधार घेत भुजबळ यांना गद्दार संबोधून ठाण्यात त्यांचा पुतळा जाळला. यामुळे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील ठाण्तातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि क्रियेस प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेसमोर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी केली. यावेळी जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, ना. छगन भुजबळ झिंदाबाद, एकच वादा अजित दादा अशा घोषणा दिल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना आनंद परांजपे यांनी म्हटले की, आमचे आदरणीय नेते आणि बहुजनांचे नेते छगन भुजबळ यांनी काही कथित वक्तव्य केली म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळसाहेबांचा पुतळा जाळला. त्यांना गद्दार म्हटले. आव्हाड यांचा विरोध केला की गद्दार ! मुळात गद्दार कोण हे या क्रियेवर प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादी काॅग्रेस कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळला. यापुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. हातात दोरा गंडा बांधून पुरोगामी भाषा करुन कोणी बहुजन नेता होत नाही. यांचे ठाणे आणि येऊर येथील बंगल्यात काय धंदे चालतात त्याची शोधपत्रकारिता करावी, असा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिला.