अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले असून हे चक्रीवादळ ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे. या वादळाचा फटका जिल्ह्यालाही बसण्याची शक्यता असल्यानं जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणांनी सज्ज रहावं अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन आपत्कालीन परिस्थितीशी सामना करणा-या सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिका-यांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, जे गेले आहेत त्यांनी परतावं, परतताना जवळच्या बंदरावर आसरा घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. सध्या सुट्टीचा कालावधी असल्यानं पर्यटक समुद्र किना-यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. मात्र या वादळाचा संभाव्य धोका ओळखून पर्यटकांनी समुद्र किनारी जाणं टाळावं असं आवाहनही जिल्हाधिका-यांनी केलं. रजेवर असणा-या सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी त्यांच्या रजा रद्द करून कामावर हजर व्हावं असे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. शेतक-यांनी काढून ठेवलेली पिकं आणि बाजार समितीत आलेल्या अन्नधान्याची नासाडी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिका-यांनी या बैठकीत दिल्या.