शहराच्या सर्व भागात चांगल्या प्रकारची उद्याने असावीत तसेच राज्याला पराक्रमाचा ऐतिहासिक वारसा असल्याने त्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून पुण्यातील मुघल उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात ‘मुगल उद्यान’ निर्माण केले जाणार आहे. या उद्यानात सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमार आणि त्यांची माहिती देण्यात येणार आहे. सरनाईक यांची ही मागणी निधीसह मंजूर झाली असून आकर्षक मुगल उद्यान निर्मितीसाठी राज्य सरकारने ५ कोटी निधी मंजूर करून मंजुरीचा शासन निर्णयही प्रसिद्ध झाला आहे. अश्या पद्धतीचे उद्यान बनविल्यास नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. हे मुगल उद्यान घोडबंदर रोडवरील मोघरपाडा येथील महापालिकेच्या १० हजार स्क्वेअर मीटरच्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर तयार केले जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील खाडी किनार्याचा वापर पौर्तुगीज काळापासून होत होता. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी ब्रिटीश, डच आणि पौर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले होते. त्यांचा बोटी बनविण्याचा कारखाना होता. ऐतिहासिक महत्व पुसले जाऊ नये आणि नवीन पिढीला त्याचे महत्व कळावे यासाठी महापालिकेच्या आरक्षित उद्यानाच्या भूखंडावर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमार आणि त्यांची माहिती देण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितले. त्याचबरोबर या उद्यानात विविध रंगबेरंगी फुलांची झाडे, हिरवळ आणि त्या सर्व झाडांचा परियच येथे करून दिला जाईल. या उद्यानात आल्यानंतर नागरिकांना शुद्ध हवा घेता येईल तर या ठिकाणी सर्व स्तरामधील लोक मोठ्या प्रमाणावर येतील अशा पद्धतीने या उद्यानाची निर्मिती केली जाईल. हे नवे उद्यान साकारत असताना त्या जागेचा योजनाबद्ध पद्धतीने उपयोग करुन मोठी बाग तयार करण्यात येईल. जी फुले पाहताच मन प्रसन्न होईल अशी फुलझाडे, हिरवळीचे विस्तीर्ण पट असतील. फुलझाडांची लागवड करताना उद्यानाच्या दुसऱ्या भागात केवळ सौंदर्यदृष्टी न ठेवता वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या उपयुक्त अशा झाडांची लागवड करून त्याची माहिती दिली जाईल. दुर्मिळ वृक्ष लावून त्याची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी त्याची माहिती त्या झाडांजवळ बोर्डवर लावली जाईल. नव्याने जे उद्यान विकसित करण्याचे नियोजन केले गेले आहे. राज्य सरकारकडून निधी वर्ग झाला असून आता महापालिकेने पुढील कार्यवाही करून याच वर्षात उद्यानाच्या कामाला सुरुवात करावी, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.