घोडबंदर पट्ट्यात झालेल्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे. घोडबंदर आणि सेवा रस्ता खचण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्या संदर्भात हे निवेदन देण्यात आलं आहे. घोडबंदर परिसरातील सेवा रस्त्यावर जवळपास ३० किलोमीटर लांबीचे मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कावेसर, न्यू होरायझन स्कूल, ब्रह्मांड सिग्नल ते आझादनगर परिसरातील रस्ते खचले आहेत. पावसाळ्याआधीच ५ किलोमीटरचा हा रस्ता खचला आहे. ईगल इन्फ्रास्ट्रक्चरनं हे काम केलं असून हे काम किती निकृष्ट दर्जाचं आहे याचा पुरावा पहिल्याच पावसात मिळाला आहे. त्यामुळं या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता व्हीजेटीआय अथवा आयआयटी मार्फत तपासून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ईगल इन्फ्रास्ट्रक्चरची चौकशी करून त्याची लेखी स्वरूपात माहिती जाहीर करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.