घोडबंदर पट्ट्यातील भूमिपुत्र शेतकर्‍यांवर माखेजा ट्रस्टकडून प्रचंड दहशत आणि दादागिरीच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्र शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

घोडबंदर पट्ट्यात सुमारे ७० वर्षांपासून वडिलोपार्जित शेती करणार्‍या स्थानिक शेतकर्‍यांना जमिनीपासून बेदखल करण्याचा दंडेल प्रयत्न माखेजा ट्रस्टने सुरु केला आहे. या ठिकाणी १०० ते १५० भाडोत्री गुंडांना बोलावून शेतकर्‍यांवर बेकायदेशीररित्या दहशत आणि दडपशाही केली जात आहे. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शेतकर्‍यांची माखेजा कुटुंबियांच्या दहशतीतून मुक्तता करावी, अशी लोकाग्रहाची मागणी येथील शिवसेनेचे युवा नेते रवि घरत आणि स्थानिक भूमिपुत्र शेतकर्‍यांनी केली आहे. ओवळा, पानखंडा, मोघरपाडा भाईंदरपाडा आदी भागात माखेजा ट्रस्टची 5 हजार एकर जमीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या शेतजमिनींवर भातशेती करुन स्थानिक भूमिपुत्र आपली उपजिविका करीत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून माखेजा कुटुंबियांकडून या जमिनीवर भाडोत्री गुंडांना उभे करुन शेतकर्‍यांना शेतामध्ये आणि जमिनीवर जाण्यास मज्जाव केला जात आहे. त्यामुळे आज शेकडो महिला आणि शेतकर्‍यांनी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात रवि घरत यांनी सांगितले की, हे सर्व शेतकरी गेल्या ७० वर्षांपासून शेतजमीन कसत आहेत. मात्र, त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून बेदखल करण्यासाठी आज माखेजा ट्रस्टकडून सुमारे १५० सराईत भाडोत्री गुंड तैनात असल्याचे दिसून आले. तसेच, पूर्वापार शेती कसणार्‍या शेतकर्‍यांवर खोटे गुन्हेदेखील दाखल केले आहेत. त्यामध्ये आज हेमंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश आहे. हेमंत पाटील यांच्यावर माखेचा ट्रस्टकडून षडयंत्र रचून पोलीसांना हाताशी धरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असे त्या ठिकाणी केलेल्या प्रत्यक्षदर्शी चर्चेतून कळते. सद्यस्थितीमध्ये माखेजा ट्रस्टकडे पाच ते साडेपाच हजार एकर जागेची मालकी असल्याचे सांगण्यात येत असले तरी सत्यता तशी नाही. यापैकी काही एकर जमिनीवर माखेजा यांचा सावकारी बोजा आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांचा शेतजमिनीवर अनेक दशके ताबा आणि कसत असतानाही बेकायदेशीरपणे बाहेरील भाडोत्री सराईत गुंडांच्या मदतीने शेतजमिन जबरदस्तीने ताबा घेऊन लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. अगदी येथील मंदिरात जाण्यापासूनही गावकर्‍यांना मज्जाव केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शेतकर्‍यांची माखेजा कुटुंबियांच्या भाडोत्री गुंडगिरी आणि दहशतीतून मुक्तता करावी, अशी मागणी रवि घरत यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading