काही दिवसांवर दहीहंडी, गणेशोत्सव असल्यामुळे सर्व उत्सव निर्विध्नपणे पार पडण्यासाठी महानगरपालिका, पोलीस यंत्रणा, वाहतूक विभाग तसेच एमएसईबी आदी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने नियमांचे पालन करुन सण- उत्सव साजरे होतील या दृष्टीने कार्यवाही करावी. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वतोपरी दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी तसेच सार्वजनिक मंडळांनी देखील उच्च न्यायालयाच्या आदेशाचे आणि महापालिकेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व उत्सव यशस्वीरित्या पार पाडता यावेत यासाठी महापालिकेच्यावतीने नियमावली तयार करण्यात आलेली आहे. तसेच गणेश मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, तात्पुरत्या स्वरुपात नोंदणी करणाऱ्या मंडळांना देखील ऑनलाईन अर्ज करता येतील तशी कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे, तरी सर्व मंडळांनी ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज सादर करावेत असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले. तसेच मंडळाचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर शक्य झाल्यास त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दोन दिवसात परवानगी दिली जाईल या दृष्टीने कार्यवाही करावी. ऑनलाईन प्रणाली एक खिडकी योजनेप्रमाणेच कार्यरत असल्यामुळे मंडळांना परवानगीसाठी आवश्यक पोलीस विभाग, वाहतूक विभाग आणि अग्निशमन विभाग यांच्या ना-हरकत दाखल्यांसाठी विभागांकडे पाठपुरावा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. या विभागांनी ऑनलाईन पध्दतीनेच ना-हरकत दाखले उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे आणि त्यानंतर गणेशमंडळास ऑनलाईन पध्दतीने अंतिम परवानगी विहित कालमर्यादेत उपलब्ध करुन दिली जाईल. रस्त्यावर सार्वजनिक उत्सवासाठी मंडप उभारताना रस्त्याचे नुकसान होणार नाही या दृष्टीने सर्वानी खबरदारी घ्यावी. उत्सव कालावधीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विजेसाठी एमएसईबीच्या माध्यमातून आवश्यक परवानगी घेवून विद्युत मीटर घेण्यात यावे. रस्त्यावरील पोलमधून अनधिकृतरित्या वीज कनेक्शन घेतल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी असे प्रकार मंडळांनी करु नये असे आवाहन आयुकत बांगर यांनी मंडळांना केले.
You must be logged in to post a comment.