परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आणि नगरसेविका रुचिता रुचिता मोरे यांच्या वतीने दरवर्षी प्रभाग क्रमांक १२ मध्ये गड किल्ले स्पर्धेचे आयोजन केले जाते. पांचपाखाडी, चंदनवाडी, गणेश वाडी, टेकडी बंगला, सिद्धेश्वर तलाव या परिसरातील मुलं या स्पर्धेत सहभागी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना समजावा यासाठी या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रत्यक्ष गडावरती जाऊन केला जातो. आजपर्यंत वसई किल्ला, लोहगड, कोरीगड, सुधागड, सरसगड आणि कर्नाळा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना किल्ल्याची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना किल्ल्यावरती नेऊन स्पर्धेचा बक्षीस समारंभ करण्यात आला. यावर्षी झालेल्या गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस समारंभ जवळ जवळ २५० स्पर्धकांसह त्यांच्या पालकांना घेऊन पेठ किल्ला कोथळी गड येथे साजरा करण्यात आला. या स्पर्धेमध्ये नरवीर तानाजी मित्र मंडळ-पांचपाखाडी यांना प्रथम, ऑल स्टार ग्रुपला द्वितीय तर शिवराय प्रतिष्ठानला तृतीय क्रमांक देऊन गौरवण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी होऊन गडावर उपस्थित राहिलेल्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. गड चढण्यासाठी शरद खोचरे, विकी हजारे, अभिषेक फाटक आणि गोविंद नाईक यांनी मुलांना मार्गदशन केले.