शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. त्या ठाण्यात जिथे निष्ठा आहे, तिथे विष्ठा कशी आली ? असा सवाल करीत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र सोडले. दिशा ग्रुप,आधार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन वर्षाचे औचित्य साधुन ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा शिवसेना उपशहर प्रमुख भास्कर बैरीशेट्टी यांनी आयोजित केला होता. त्यावेळी अरविंद सावंत बोलत होते. एकवेळ लढावू नाही बनलात तरी चालेल, पण विकाऊ होऊ नका” ठाण्याचे धर्मवीर आनंद दिघे हे कधीच विकाऊ झाले नाही.ज्या ठाण्याने पहिली सत्ता शिवसेनेला दिली, जिथे निष्ठा होती त्या ठाण्यात ही विष्ठा कशी आली ? हा एकनाथ असुनी नाथ … अनाथ आहे. असे उद्गार काढत अरविंद सावंत यांनी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राज्यात सत्तांतर होऊन शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. शिवाईनगर परिसरातील माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी आणि भास्कर बैरीशेट्टी यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे. ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे हे नाते आजही कायम राहील आणि भविष्यात देखील हे नाते घट्टच राहील. असा विश्वास भास्कर बैरीशेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.