खारघर दुर्घटनेत १३ नाही तर सुमारे ५० जणांना आपले प्राण गमवावे लागले असून जवळ जवळ ५०० लोक जखमी झाले असल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री आरीफ नसीम खान यांनी केला आहे. त्यामुळे मृतांना २५ लाखांची मदत आणि त्यांच्या कुटुबियांतील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत करण्यात यावी, ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते, त्यात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत ज्या कंपनीला सबकंत्राट देण्यात आले होते. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. ठाण्यात कॉंग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नसीम खान यानी सागितले की, वास्तविक पाहता हा सोहळा राजभवनमध्ये घेणे अपेक्षित होते. परंतु भर उन्हात हा सोहळा केवळ राजकीय फायद्यासाठी घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोरोनाच्या नव्या व्हॅरीएन्टच्या केंद्राकडून गाईड लाईन देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ठाणे, नवीमुंबई आदींसह इतर ठिकाणी जमावबंदी लागू असतांनाही हा कार्यक्रम घेण्यात आला. याशिवाय १४ कोटींचा खर्च करुन केवळ जे राजकीय पुढारी आले होते, त्यांच्यासाठी सर्व सुविधा होत्या. मात्र जे लोक दुरवरुन आले होते, त्यांच्यासाठी पाणी, जेवण, मंडप आदी आवश्यक अशा व्यवस्था ठेकेदाराने केली नव्हती. शिवाय ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते त्याने सब कंत्राट दुसऱ्याला का दिले? हे असा सवालही त्यांनी केला. ज्या कंपनीला हे काम दिले त्या लाईट अॅन्ड शेड या कंपनीचा एक भागीदार शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला. या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करण्यात यावा आणि या प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे या घटनेत जे मृत झाले आहेत, त्यांचे साधे सांत्वन करायला देखील एकही नेता गेला नाही. या घटनेतील मृतांना प्रत्येकी २५ लाख, तसेच त्यांच्या कुटुंबियातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी आणि उपचारार्थ दाखल असलेल्या लोकांना १० लाखांची मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.