खाडी किनारा प्रकल्पाच्या मंजुरीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून उच्च न्यायालयानंही महाराष्ट्र सागरी किनारा मंडळाने घातलेल्या अटी आणि शर्थींच्या अधीन राहून काम करण्याची मंजुरी दिली असल्यानं यापुढील कालावधीत प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना देतानाच नोव्हेंबर किंवा डिसेंबर पर्यंत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. पर्यावरणाचा समतोल साधत ठाण्याच्या खाडीचा किनारा सुशोभित करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं ३२ किलोमीटरचा महत्वाकांक्षी खाडी किनारा विकास प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. यामध्ये खाडीचं जतन, सुशोभिकरण आणि स्वच्छता या बाबींचा समावेश होता. या सर्वंकष आराखड्याच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीनं पारसिक रेतीबंदर, नागला बंदर, कावेसर, वाघबीळ, कोलशेत, साकेत-बाळकूम, कळवा- शास्त्रीनगर आणि कोपरी या ७ ठिकाणी खाडी किनारा विकास प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित सर्व अधिकारी आणि ठेकेदारांची संयुक्त बैठक घेऊन खाडी किनारा विकास प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी या प्रकल्पासाठी मिळालेल्या सर्व परवानग्यांची माहिती प्रदर्शित करावी तसंच साधारण नोव्हेंबर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करावे अशा सूचनाही पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.