कोविडमुळे मृत्यू झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या हाजीमलंगगड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्रीराम गवारे यांच्या कुटुंबियांना शासनाने ५० लाखांचा विमा कवच निधी मंजुर केला होता. आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते तसेच जिल्हा परिषद समिती सभापती, सदस्य यांच्या उपस्थितीत कोविड योध्दा गवारे यांच्या पत्नीकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. कोरोना काळात कर्तव्य बजावताना कोरोना विषाणू संसर्गामुळे ३० सप्टेंबरपर्यंत मृत्यू झालेल्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्देशाने शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला होता. ही विमा कवच रक्कम वितरित करण्यासाठी राज्य शासनामार्फत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान राज्य प्रकल्प संचालकांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत विमा कवच रक्कम जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह , ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती मोठ्या शर्थीने लढा देत आहेत. कोविड प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या सगळ्या उपाययोजनाची अंमलबजावणी केली जात आहे. सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासनाला यश मिळत आहे.