शालांत परीक्षा कालपासून सुरू झाली असून कॉपीच्या वाढत्या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी शासनानं काही नवीन निर्देश जारी केले आहेत. अलिकडच्या काळात पेपरफुटीची प्रकरणं मोठ्या प्रमाणावर पुढे येत असून कालही शालांत परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा होती. त्यावर उपाय म्हणून शासनानं आज काही निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रावर वेळेनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळं एक पेपर न दिल्यास संबंधित विद्यार्थ्याचं वर्षही वाया जाऊ शकतं अशी कडक उपाययोजना शासनानं यावर केली आहे. शालांत परीक्षेसाठी इतर अनेक नियमही असताना आता वेळेनंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्याला प्रवेश न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.