मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजशिष्टाचाराचा अवमान केला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरुन नारायण राणे यांनी मराठी अस्मितेचा अपमान केला आहे. त्यांचे हे बेताल वक्तव्य जनतेमध्ये तेढ निर्माण करणारे असून याचा निषेध व्यक्त करीत नारायण राणे यांच्या विरोधात ठाण्यातील शिवसैनिकांनी आंदोलन करुन नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. महाड येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर व्देषापोटी बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याचा निषेध केला जात आहे. महापौरांच्या नेतृत्वाखाली आज नौपाडा पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घटनात्मक पदाचा अवमान केल्याबद्दल त्यांना तातडीने अटक व्हावी अशी मागणी केली आहे. केवळ वैयक्तिक द्वेषापोटी केलेल्या या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे, तसेच समाजात शत्रुत्व आणि दुष्टपणाची भावना निर्माण होईल. नारायण राणे यांच्या विधानांमुळे मुख्यमंत्री कुठलेही काम करीत असताना सामान्य नागरिक देखील त्यांचेवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील अशीही शक्यता आहे. किंबहुना शिवसेना भाजपामधील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण होवू शकतो. ठाण्यामध्ये संघर्ष आणि तणावाचे वातावरण निर्माण होवू नये तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे राजशिष्टाचाराचा भंग झाला असल्याने आम्ही ही तक्रार दाखल करीत असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. यावेळी ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांचा मोर्चा घोषणा देत जात असतानाच पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मोर्चा अडविला, यावेळी शिवसैनिकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसैनिकांनी संयमानी हा मोर्चा विसर्जित केला.