काटई, कोनगाव आणि खारघर टोलनाक्याप्रमाणे मुंबईतील पाच टोलनाक्यांवरील लहान चारचाकी वाहनांची त्वरित टोलमुक्ती करुन महायुती सरकारने ठाणेकर जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, पालघर आणि ठाणे समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. ठाणेकरांना नाहक टोलचा भुर्दंड बसतो. यामुळे MH04 ची ठाण्यातील जी वाहने आहेत त्या गाड्यांची टोलमुक्ती करुन ठाणेकर जनतेला त्वरित दिलासा द्यावा. संपूर्ण टोलमुक्तीसाठी एमएससीआरडीएचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्य सचिव, एमएसआरडीएचे अधिकारी, टोल काॅन्ट्रॅक्टर यांनी एकत्र बसून टोलप्रश्नावर धोरण ठरवावे आणि मुंबईतील, दहिसर, ऐरोली, वाशी, आनंदनगर, एलबीएस मुलुंड यां पाच एन्ट्री पाॅईंट टोलनाक्यांवरील टोलप्रश्नांवर मार्ग काढून जनतेला, महायुती सरकारने दिलासा द्यावा, अशी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले. मी त्याहीवेळेस अविनाश जाधव यांना विनंती केली होती की राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले तर याच्यातुन काहीतरी तोडगा निघू शकतो. २०१० पासून ते २०२६ पर्यत टोलचा करार एमईपीएल बरोबर आहे. दर तीन वर्षांनी १ ऑक्टोबरला पाच रुपये हे टोलमागे वाढविले जातात. मागच्या वेळी १ ऑक्टोबर २०२० ला पाच रुपये टोलमागे वाढविले गेले होते. २०१० पासून टोलवाढीची ही प्रक्रिया सुरू आहे. यातुन जर खऱ्याअर्थाने काही मार्ग काढायचा, जनतेला टोलमुक्त करायचे असेल तर एमएससीआरडीएचे खाते मुख्यमंत्र्यांकढे असल्याने मुख्यमंत्र्यांना जर राजसाहेब भेटले तर काही मार्ग निघू शकेल हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे, असे आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.