आधीच अस्तित्वासाठी झगडत असलेल्या काँग्रेसमध्ये सर्वांनी एकत्र येऊन पक्ष वाढवण्याची गरज असताना पक्षातील गटबाजी दिसून येत आहे. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचारी कारभारावरून काँग्रेस नेते रविंद्र आंग्रे यांनी आंदोलन छेडण्याची धमकी दिली असताना शहर काँग्रेसनं या आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी हे काँग्रेसचं अधिकृत आंदोलन नसल्याचं पत्रक काढून या आंदोलनाला खो घातला आहे. यामुळं काँग्रेसचंच हसं झालं आहे. रविंद्रनाथ आंग्रे यांनी एका पत्रकार परिषदेत मोर्चा आणि साखळी उपोषणाची घोषणा केली असताना शहर काँग्रेसनं तत्परता दाखवत हे आंदोलन काँग्रेसचं नसल्याची भूमिका घोषित केली. त्यावर प्रदेश काँग्रेसनं हे आंदोलन काँग्रेसचंच असून यामध्ये राज्यातील विरोधी पक्षनेतेही सहभागी होणार असल्याचं पत्रक काढून शहर काँग्रेसच्या भूमिकेला एकूणच चपराक दिली आहे. यामुळं काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे.