कळव्याच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयातील ५ डॉक्टरांनाच डेंग्यू झाल्याचं समोर आलं आहे. कळवा रूग्णालयात उपचारासाठी दररोज शेकडो गरीब रूग्ण येत असतात. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात डॉक्टरांची कमतरता भासत आहे. रेडिओलॉजी विभागात २ वरिष्ठ डॉक्टर आणि ६ शिकाऊ डॉक्टरांची टीम कार्यरत असते. या विभागात गरोदर स्त्रिया मोठ्या प्रमाणात येत असल्यानं या विभागाची जबाबदारी वरिष्ठ डॉक्टरांवरच असते. परंतु गेल्या काही दिवसापासून या विभागातील ५ डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आलं आहे. याबाबत महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना विचारलं असता त्यांनी परिस्थिती एवढी गंभीर नसून काही डॉक्टर कामावर हजर झाले असल्याची माहिती दिली. डेंग्यूला रोखण्यासाठी शहरातील विविध भागात औषधं फवारणीचं काम सुरू असल्याचंही माळवी यांनी सांगितलं. दरम्यान खारकर आळीतील प्रमोद कदम यांचा डेंग्यूनं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.