कळवा पूल आणि भारत गियर पूलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करून तो लोकांच्यासाठी सुरू करण्याची आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी

कळवा पूल आणि भारत गियर पूलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करून तो लोकांच्यासाठी सुरू करावा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. कळवा पुलाच्या उद्घाटनाबाबत विचारले असता, ‘आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे की, लवकरात लवकर शिल्लक काम पूर्ण करुन पुलाचे उद्घाटन करा. मुंब्रा-कौसा येथील भारत गिअरच्या उड्डाणपुलाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. त्याचेही उद्घाटन करुन घ्यावे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान रहावा, अशी अपेक्षा आहे. हे दोन्ही पूल आपल्या मतदारसंघातील असून ते आपणच मंजूर करुन आणले आहेत. त्यानंतर उगाच बोंबाबोंब करायची की जितेंद्र आव्हाडांनी आगाऊपणा केला आणि पुल खुला केला. आपणाला तसे करायचे नाही. आपण मोठ्या मनाने सांगत आहोत की पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त आपली गाडी पुलावरुन फिरवावी. कारण, लोकांना भाषणे ऐकण्याची फार काही हौस असते अशातला भाग नाही. लाल फित लावलेली असेल ती कापा; फोटो काढा; आपल्या नावाची पाटी लावा; तो पूल कोणी करुन घेतला, याच्या मागे कोण आहे, हे लोकांना माहित आहे त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे ती थांबवा; आपण जर पूर्वीप्रमाणे वागलो असतो तर आतापर्यंत पुलाचे उद्घाटन झाले असते. पण, मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत; त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, या मताचा मी आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर दोन्ही पुलांचे उद्घाटन करावे, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading