कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी पालिकेने अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेत करदात्याने संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराच्या मागणीची दंड, व्याजासहची २५ टक्के रक्कम एक रकमी भरल्यास त्याला ७५ टक्के शास्ती रक्कम माफ केली जाणार असून गेल्या अनेक वर्षाची मालमत्ता कराची सुमारे अठराशे कोटीची रक्कम थकबाकीदारांकडे आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट, कौटुंबिक वादात अडकली आहेत. प्रशासनाला कर वसुली करताना अडथळा येतो. अभय योजनेतून सुमारे २०० ते २५० कोटीचा महसूल मिळेल, असा विश्वास आयुक्त दांगडे यांनी व्यक्त केला. मागील दहा वर्षाच्या काळात मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेने वेळोवेळी महसुली वसुलीचा भाग आणि करदात्यांना कर भरण्यासाठी सोयीचा मध्यम मार्ग म्हणून अभय योजना राबविल्या आहेत. गेल्या दोन वर्षाच्या काळात करोना महासाथीत पालिकेचे उत्पन्न घटले होते. त्यावेळी या योजनेची अंमलबजावणी प्रशासनाने केली होती. या योजनेला नागरिकांसह विकासकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ही योजना पुन्हा लागू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. या योजनेची पुन्हा अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिका आयुक्तानी घेतला आहे.