कल्याण डोंबिवली शहराच्या प्रमुख समस्यांपैकी एक समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. मात्र ही वाहतूक कोंडी बेशिस्त वाहन चालकांमुळे होत असल्याच दिसत आहे. शहरात विशेषतः भाडे सोडण्यासाठी आणि भरण्यासाठी रस्त्याच्या मधोमध रिक्षा लावत असल्याने वाहतूक कोंडी होत असून वाहतूक विभाग आणि आरटीओचं कोणतंही नियंत्रण रिक्षांवर नसल्याचं दिसत आहे. कल्याण डोंबिवली शहरं ही सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांची शहरं म्हणून ओळखली जातात. बहुतांश चाकरमानी हे प्रवासा साठी रिक्षांवर अवलंबून असतात. त्यातच परमिट प्रक्रिया सोपी झाल्याने रिक्षांची संख्या देखील वाढली आहे. शहरात वाहतूक कोंडी ही रिक्षांमुळे होत असल्याचं नागरिकांच म्हणणं आहे. अनेकदा रिक्षा ह्या वाटेल तशा उभ्या केल्या असतात. त्यातच भाडं दिसलं की कुठेही प्रवासी घेण्यासाठी रिक्षा उभ्या केल्या जातात. एक रिक्षा रस्त्यात थांबली की मागे वाहनांची रांग लागते. मोकळी जागा दिसली की कुठेही रिक्षा उभी केली जाते , अतिरिक्त रिक्षाही वाढल्या आहेत , रिक्षाचालकांची तपासणी केली जात नाही , कागदपत्रे बघितली जात नाही , आरटीओ आणि वाहतूक विभागाचे कोणतंही नियंत्रण रिक्षाचालकांवर नाही असा आरोपी एमएच 05 या प्रवासी संघटनेने केला आहे. तर रिक्षाचालक बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या करतात, मर्जीप्रमाणे भाडं घेतात , वाहनांच्या सलग रांगेतून मध्येच प्रवासी भाडं घ्यायला रिक्षा थांबवतात. यामुळे अपघातांची शक्यता असते असे डोंबिवलीकरांनी सांगीतले आहे. आरटीओ आणि वाहतूक विभाग हे रिक्षा चालकांना शिस्त लावतात का? त्यावरही नागरिक लक्ष ठेवुन आहे. कारण कायद्याची कोणतीही भीती नसल्याने हा मनमानी कारभार सुरू असल्याचं कल्याण डोंबिवलीकरांच म्हणणं आहे.