कल्याण- कल्याणमधील दुर्गाडी पुलावरील दोन मार्गिका आणि रांजणोली उड्डाणपुलाच्या ठाण्याकडील मार्गिकांचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे कल्याण आणि भिवंडी परिसरातील वाहतूककोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. कल्याण शहराला जोडणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडीवर बांधण्यात आलेल्या चार मार्गिकांच्या पुलापैकी पहिल्या दोन मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. पत्रिपुलाचे काम आणि गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर दुर्गाडी पुलापाशी वाहतूक वाढल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली होती. या ठिकाणी असलेल्या जुन्या पुलावरूनच दोन्ही मार्गिका सुरू होत्या. अशात या नवीन पुलाच्या दोन मार्गिका सुरू झाल्याने शहराला वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. या नवीन पुलामुळे जुन्या पुलावरून येणे आणि नव्या पुलावरून जाणे शक्य होणार असल्याचं मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. तर मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिकवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या राजणोली उड्डाणपुलावरील दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण झाल्यामुळे भिवंडी जंक्शनपाशी होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे. त्याचा फायदा या महामार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या छोट्या आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात होणार आहे.