ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना चालना देण्यासाठी आज महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या दालनात आमदार प्रताप सरनाईक यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्य शासनाकडून आलेला सुमारे ९०० कोटी रूपयांचा निधी आणि इतर निधीबाबत पुढील ४५ दिवसांमध्ये निर्णय घेण्याचे आदेश आयुक्तांनी अधिका-यांना दिले. त्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास प्रस्ताव नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच मार्गी लागणार आहेत असे सरनाईक यांनी सांगितले. त्याचबरोबर समतानगर येथील आनंदराम नगर, राजीव गांधी नगर, लोकमान्यनगर येथील सिध्दिविनायक पुर्नवसन वसाहत गेल्या २५ वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या भुखंडावर वसविण्यात आली होती. परंतू, या वसाहतींचे काळानुरूप अतिशय दारूण अवस्था झाली असून सर्व चाळी, इमारती धोकादायक झाल्या आहेत. या वसाहतींचे रिडेव्हलपमेंट करण्यासाठी प्रताप सरनाईक गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. चटई क्षेत्र उपलब्ध होत नसल्यामुळे हा पुर्नविकास थांबला होता. परंतू नवीन आलेल्या युनिफाईड डि.सी.आर.मुळे जास्त चटई क्षेत्र मिळत असल्याने या इमारतींचा पुर्नविकास होऊ शकतो, असे प्रताप सरनाईक यांनी निर्दशनास आणून दिले. यावेळी सरनाईक यांनी यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर आयुक्तांनी नवीन नियमावलीचा आधार घेऊन पुढील दिड महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. यामुळे नवीन वर्षामध्ये आनंदराम नगर, राजीव गांधी नगर आणि सिध्दिविनायक वसाहतींचा पुर्नविकास होणार आहे.