मध्य रेल्वेवर घेण्यात आलेल्या विशेष ब्लॉकचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला. यामुळं प्रवाशांचे चांगलेच हाल झाल्याने प्रवासी संतप्त झाले होते. ठाकुर्ली स्थानकात पादचारी पूलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला होता. कल्याण-डोंबिवली दरम्यान धिम्या आणि जलद मार्गासह पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर हा गर्डर टाकण्यात येणार होता. सकाळी पावणे दहा ते दुपारी पावणे दोन या काळात ४०० टनाचे ६ मीटर रूंदीचे ४ गर्डर टाकले जाणार होते. यामुळे साडेचार तास कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यासाठी १६ मेल एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या होत्या. उपनगरीय सेवा ठप्प झाल्यामुळे प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसत होती. ऐन ख्रिसमसच्या दिवशीच उपनगरीय सेवा ठप्प असल्याचा परिणाम प्रवाशांवर झाला आणि प्रवाशांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.