नव्या कृषि कायद्याला विरोध करीत देशव्यापी शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला ठाणे काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱयांच्या या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला असून या राष्ट्रव्यापी शेतकरी आंदोलनास काँग्रेसने सुद्धा समर्थन दिले आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशच बंद असल्याची स्थिती संपूर्ण वर्षभर आहे.परंतु या संकट काळातही शेतकरी कर्तव्य भावनेने शेतात राबत होता हे विसरता येणार नाही.त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा राष्ट्रव्यापी बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आणि ठाण्यांतील व्यापारी, विविध व्यावसायिक यानी स्वखुशीने आपापली दुकाने/आस्थापना बंद ठेऊन अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहीजे असे भावनिक आवाहन ठाणे काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं आहे. सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठाणे बंद यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत दुकानदारांना, व्यापाऱ्याना धाक धपाटशहा न दाखविता ठाणे बंद करण्याचे आवाहन करण्यात यावे. कोणतीही जाळपोळ,तोडफोड, न करता बंद ला हिंसक वळण लागणार नाही याची दक्षता घेऊन शांततेच्या मार्गाने बंद यशस्वी करावा हा बंद 100 टक्के यशस्वी होण्यासाठी शिस्तबद्ध रीतीने ,नम्रतापूर्वक ,सामंजस्याची भूमिका घेऊन प्रयत्न करावेत असे आवाहन शहर काँग्रेसच्या वतीनं सचिन शिंदे यांनी केलं आहे.