घोटाळ्यांपेक्षा घोटाळ्यांची माहिती कुणी दिली.यावर सध्या खल सुरु आहे.तेव्हा, मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांची माहिती कुणी दिली ? हे देखील विचारणार का ? असा सवाल वादग्रस्त क्लिप प्रकरणी बोलताना भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला. तसेच,ठाकरे सरकार आपले फोन टॅप करीत असल्याचे या क्लिपमुळे सिद्ध झाल्याचेही ते म्हणाले. ठाण्यातील केबीपी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. महाविकासआघाडीतील शिवसेनेचे हेवीवेट मंत्री अनिल परब यांच्या घोटाळ्यांची माहिती शिवसेनेचेच माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे यांच्यामार्फत किरिट सोमय्या यांच्यापर्यत पोहचवल्याच्या कथित ऑडिओ क्लिप समोर आल्या होत्या.त्यानंतर शिवसेनेत घरचा भेदी कोण असा सवाल केला जात असतानाच घोटाळ्यांपेक्षा या क्लिपमागे कोण आहे ? याचीच चर्चा राजकारणात रंगली आहे.या पार्श्वभूमीवर किरिट सोमय्या यांना छेडले असता, आपल्याला कोण माहिती देतात ते महत्वाचे नाही,घोटाळ्यांची माहिती खरी आहे. आता ठाकरे सरकारमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे.कधी सुनील तटकरे हे अनंत गीतेवर बोलतात,तर गीते सुनील तटकरेवर बोलतात. आता हा नवा वाद सुरू झाला आहे.अनिल परब आणि रामदास कदमबाबत कोण, कोणाला माहिती देत आहे. याचे कवित्व सुरु आहे. तेव्हा, घोटाळ्याची माहिती कोण देतो यापेक्षा त्या माहितीतुन घोटाळा उघड होत असतानाही ठाकरे सरकार ढिलाई का करत आहे? जी माहिती मिळते ती एकही माहिती चुकीची नाही.असा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. सध्या एकच विचारले जात आहे की, तुम्हाला रामदास कदम ने माहिती दिली की प्रसाद कर्वेशी तुम्ही बोललात ? विविध माहिती आपल्याला मिळत आहे.मग,उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्याची माहिती कोणी दिली ? हे विचारणार का ? असा सवाल करून सोमय्या यांनी,या क्लिप प्रकरणामुळे ठाकरे सरकारकडुन माझे फोन टॅप करीत असल्याचे सिद्ध झाल्याचा खुलेआम आरोप केला. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांसह अनेकांचे घोटाळे चव्हाट्यावर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील काम करत असुन घोटाळेबाजांना मोकळे सोडतात तर घोटाळे बाहेर काढणाऱ्यांना आत डांबतात.असा आरोप किरिट सोमय्या यांनी केला.तसेच,येत्या ३१ डिसेंबरपर्यत ठाकरे सरकारचे घोटाळे अंतिम निवाड्याच्या दिशेने असतील.असा विश्वासही सोमय्या यांनी व्यक्त केला.