खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी येथील दुर्घटनेत सापडलेल्या अनेकजणांचा जीव वाचवून टीडीआरचा चमू काल ठाण्यात परतला. या चमूचं काल स्वागत करण्यात आलं. टीडीआरचे जवान ईर्शाळवाडीतील दुर्घटनेत बचाव कार्यासाठी गेले होते. ही घटना इतकी दुर्गम भागात घडली होती की तिथे मानवी बचाव पथकांशिवाय इतर कोणतीही यंत्रणा पोहचू शकत नव्हती. हवेचा जोर आणि जोरदार पाऊस तसंच आडवळणाच्या वाटा अशा परिस्थितीत इतर कोणतीही यंत्रणा पोहचवता येत नसल्यामुळे मानवी मदतीवर बचावकार्य पूर्ण करण्यात आलं. हे बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर टीडीआरचं पथक ठाण्यात परतलं. या पथकानं या दुर्घटनेत जमिनीखाली गाडल्या गेलेल्या अनेकांना जिवंत बाहेर काढण्याचं काम केलं. ठाणे महापालिकेनं आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्य करण्यासाठी या पथकाची निर्मिती केली आहे.