आर.टी.ई. २५ % प्रवेशाची लॉटरी प्रक्रिया राज्यस्तरावरून पूर्ण करण्यात आली असून या निवड यादीमध्ये जिल्ह्यातील एकूण १०४२९ अर्जांची निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे. वंचित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आर.टी.ई मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा जिल्ह्यात ही प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेश प्रक्रियेतील निवड झालेल्या बालकांचे प्रवेश घेण्याकरता पालकांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका, महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती आणि कागदपत्रे शाळेत जमा करावीत.