ठाण्यातील एका महिलेने मारहाणीचा आरोप केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन महिलेची भेट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारवेळी माजी नौदल अधिकारी आणि ठाण्यातील नागरिक अनंत करमुसे यांना मारहाण झाली त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्या नागरिकांची भेट घेतली नव्हती. तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म?, असा टोला भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लगावला आहे. ठाण्यात महिलेला झालेली मारहाण समर्थनीय नाही. पण या मारहाणीचे निमित्त साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विनाकारण टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे असताना ठाण्यात अनंत करमुसेंना तर मुंबईत निवृत्त नौदल अधिकारी मनोज शर्मा यांना मारहाण झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे वा ठाकरे कुटुंबियांकडून कोणाचीही भेट घेण्यात आलेली नव्हती. त्यावेळी त्यांनी मारहाण झालेल्या व्यक्तींची भेट घ्यायला हवी होती. आता सत्ता गेल्यानंतर सोयिस्करपणे भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका म्हणजे आभाळाकडे पाहून थुंकण्यासारखे आहे. ती थुंकी त्यांच्यावर येते असा टोलाही निरंजन डावखरे यांनी लगावला.