आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महायुतीतील जागावाटप हा विषय महत्त्वाचा नाही आहे. आमच्या दृष्टीकोनातून 400 पार कसं होईल आणि महायुती महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा कशी जिंकेल हा विषय महत्वाचा असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खासदारांची एक बैठक आज ठाण्यात बोलावली होती. या बैठकीनंतर राहुल शेवाळे बोलत होते. सध्याच्या विद्यमान खासदारांची आणि त्यांच्या मतदार संघांची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. सर्व खासदारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून महायुतीच्या जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल असं शेवाळे यांनी सांगितलं. कुठलाही खासदार नाराज नसून नरेंद्र मोदी यांनी तिस-यांदा पंतप्रधान व्हावं यासाठी आमच्या सर्वांचा निर्धार असल्याचं शेवाळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.