ठाणे महापालिका निवडणुक लढवण्याचा निर्णय आपने जाहीर केला आहे. दिल्ली आणि पंजाब निवडणुकांप्रमाणेच आम आदमी पार्टीने जाहीरनाम्यात विविध घोषणा केल्या आहेत. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना ठाणेकरांना नवा पर्याय देण्याकरिता जोरदार हालचाली आम आदमी पक्षाने सुरू केल्या आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये घवघवीत विजय मिळाल्यानंतर ठाण्यात आप संघटन विस्तारास अधिक गती मिळण्यासाठी नवीन कमिटीचे गठन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचं एका पत्रकार परिषदेत आपचे ठाणे शहर अध्यक्ष राकेश आंबेकर यांनी सांगितलं. ठाणेकर सध्याच्या पालिका कारभारापासून त्रस्त असून योग्य पर्याय म्हणून आम आदमीकडे मोठ्या आशेने पहात आहेत असं त्यांनी सांगितलं. महापालिका निवडणुकीत व्यवस्था परिवर्तन करण्याची ईच्छा असणाऱ्या सर्व स्तरातील ठाणेकरांना पक्षाची उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे भष्ट्राचार मुक्त ठाणे हाच आमचा संकल्पनेवर ठाणेकर प्रतिसाद देतील याची खात्री असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.