आकाशातले ग्रह-तारे माणसांचं जीवन घडवत- बिघडवत नाहीत तर माणसांच्या जीवनातील आग्रह, दुराग्रह, पूर्वग्रह हे माणसाचं जीवन घडवत-बिघडवत असतात असे विचार खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले. ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने सोमण यांच्या पंचांग आणि कॅलेंडर तयार करण्याच्या कार्याला ५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं आणि ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी एका प्रकट मुलाखतीत त्यांनी हे विचार व्यक्त केले. व्हीजेटीआयमध्ये शिक्षण घेतल्यानंतर मफतलाल कंपनीत केलेली नोकरी आणि नोकरी दरम्यान मालकांचे मिळालेले सहकार्य याविषयी त्यांनी आठवणी सांगितल्या. वडीलांच्या निधनानंतर पंचांग लिहिण्या वाचण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी तसंच खगोल अभ्यासासाठी वयाच्या ५०व्या वर्षी नोकरी सोडली. आकाशातले ग्रह म्हणजे भविष्य नसून खगोलीय गणित असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान केंद्र उभारले जावे अशी अपेक्षा व्यक्त करत आयुष्यात निर्भय व्हा आणि भीतीवर मात करण्याचा सल्ला सोमण यांनी दिला.